आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची रंगतदार मेजवानी. रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाने विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला
*आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची रंगतदार मेजवानी.
रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाने विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला*
तळेगाव दाभाडे :
येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडले शैक्षणिक गुणवत्ता, कलागुणांना वाव आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ गोल्डन, तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संतोष परदेशी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध सामाजिक विषयांवर आधारित रांगोळी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय एकता, ऑपरेशन सिंदूर, सोशल मीडियाचा परिणाम यांसारख्या विषयांवरील कल्पक रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे होते. प्रमुख उपस्थित म्हणून आशा सोहनी यांची लाभली. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘विश्वविजेता’ या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. यावेळी इयत्ता बारावी कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या रागिनी नाईक हिला आदर्श कनिष्ठ महाविद्यालय स्कॉलरशिपचा धनादेश प्रदान करण्यात आला.
संस्थेचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, मुख्याध्यापक संतोष खामकर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. माधुरी चंदनशिव, बाळासाहेब जाधव, माजी विद्यार्थी सोनाली जाधव व प्रतीक पानसरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थिनी सोनाली जाधव हिने ‘सी.ए.’ परीक्षा, तर प्रतीक पानसरे याने ‘सौ. एम.ए.’ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. दोघांनीही आपल्या यशाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
संस्थेचे सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी प्रास्ताविक केले, तर प्र. प्राचार्य संजय देवकर यांनी महाविद्यालयाचा सविस्तर वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी संतोष परदेशी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले
“विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळविताना आई-वडील, गुरुजन आणि समाजाचे ऋण सदैव लक्षात ठेवावे. संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारावरच खरे यश मिळते,” असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात यादवेंद्र खळदे यांनी परिश्रम, जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीवर भर देत एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक वापर करण्याचा सल्ला दिला. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत गुंड, प्रा. पुष्पलता धुमाळ, प्रा. प्रणिता गजभिव व प्रा. वैशाली गवारी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पल्लवी वंजारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले.





