राजकीय

माणस हेच भांडवल. जिल्हा परिषद निवडणुकीत सौ मेघाताई भागवत यांचा विश्वासघोष


माणस हेच भांडवल. जिल्हा परिषद निवडणुकीत सौ मेघाताई भागवत यांचा विश्वासघोष

 

इंदोरी(मावळ)

सप्रेम नमस्काराने सुरू झालेलं हे पत्र केवळ शब्दांचं नव्हे, तर एका प्रवासाचं, नात्यांचं आणि विश्वासाचं प्रतिबिंब ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ. मेघाताई प्रशांत भागवत यांनी मांडलेली भूमिका ही नेहमीच्या राजकीय भाषेपेक्षा वेगळी, अधिक आपुलकीची आणि भावनिक आहे. राजकारणात घोषणांचा गजर असतो, पण इथे आहे मनाचा आवाज.

 

राजकारण आणि समाजकारण जवळून पाहताना माणसं जोडणं हीच खरी शिदोरी असल्याचं त्या ठामपणे सांगतात. त्यांच्या पतींनी, प्रशांत भागवत यांनी आयुष्यभर जपलेली नाती, कमावलेली माणसं, आज त्यांच्या आयुष्याचं आणि उमेदवारीचं खरं भांडवल ठरत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना मी केवळ पत्नी म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या संघर्षाची साक्षीदार म्हणून उभी होते.असे त्या भावुक शब्दांत नमूद करतात.

 

ही उमेदवारी केवळ एक निवडणूक नसून, एका सुनेनं आपल्या सासरच्या आणि माहेरच्या माणसांसाठी दिलेला शब्द आहे, अशी भावना त्यांच्या पत्रातून स्पष्टपणे उमटते. ग्रामीण समाजरचनेत नात्यांना, आपुलकीला आणि विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याच मूल्यांवर आधारित ही उमेदवारी असल्याचं त्या सांगतात.

 

स्त्री आणि राजकारण याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही त्या स्पष्ट उत्तर देतात. जी स्त्री आपलं घर सावरू शकते, ती समाजाचं घरपणही टिकवू शकते. हे वाक्य केवळ विचार नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या स्वतःला केवळ लोकप्रतिनिधी न मानता, प्रत्येकाच्या घरातील हक्काची माणूस म्हणून काम करण्याचं वचन देतात.

 

तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.हा त्यांचा शब्द राजकीय आश्वासन न वाटता, वैयक्तिक जबाबदारीसारखा भासतो. प्रशांतदादांच्या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन अहोरात्र सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही निवडणूक स्वतः लढवत नसून, आपल्या पाठीशी उभे राहिलेले हजारो माय-बाप लढवत आहेत, ही भावना त्यांच्या नम्रतेचं दर्शन घडवते.

 

पत्राचा शेवट आपल्या या लेकीला आशीर्वाद द्यायला विसरू नका या विनम्र प्रार्थनेने होतो. राजकारणात क्वचितच दिसणारी ही लेकीची हाक मतदारांच्या मनाला स्पर्श करणारी ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा भावनिक, नात्यांवर आधारित आणि विश्वासाचा सूर मतदारांवर किती प्रभाव टाकतो, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, सौ. मेघाताई भागवत यांची ही साद केवळ राजकीय नसून, ती माणुसकीची आहे, हे नक्की.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *