महत्त्वाचे

मुंबई पुणे प्रवास होणार अधिक जलद:१ मे पासून मिसिंग लिंक सुरू होणार


मुंबई पुणे प्रवास होणार अधिक जलद:१ मे पासून मिसिंग लिंक सुरू होणार

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती प्रवासाला नवे पंख देणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्णत्वास पोहोचला असून, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास सुमारे अर्धा तासाने कमी होणार असून, प्रवाशांसाठी ही दिलासादायक घडामोड ठरणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत विकसित यशवंतराव चव्हाण महामार्गावरून प्रवास करताना खंडाळा घाटातील वळणावळणाचा मार्ग ओलांडावा लागतो. या घाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटना प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत होत्या. विशेषतः लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटनाच्या हंगामात वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने तासन्‌तास अडकून पडण्याची वेळ येत होती.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. सुमारे १३.३ किमी लांबीच्या या मार्गात अत्याधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला आहे. प्रकल्पात दोन भव्य बोगद्यांचा समावेश आहे—एक ८.९ किमी आणि दुसरा १.९ किमी लांबीचा. याशिवाय ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आणि ९०० मीटरचा वायडक्ट (V-1) उभारण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हा केबल-स्टेड पूल जमिनीपासून तब्बल १८० मीटर उंचीवर बांधण्यात आला असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ च्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व संरचनात्मक कामे पूर्ण झाली असून, अंतिम तपासणीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

या प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाले होते. सुरुवातीला डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, कोविड महामारी, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे प्रकल्पाला विलंब झाला. अखेर सुमारे ६,६९५ कोटी रुपयांच्या खर्चातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वास गेला आहे.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अपघातांचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा आहे. परिणामी, मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *