ताज्या घडामोडी

मावळ पोलीस यंत्रणेला नवे बळ; वडगाव- कामशेत पोलीस ठाण्यांना नवे पोलीस निरीक्षक


मावळ पोलीस यंत्रणेला नवे बळ; वडगाव- कामशेत पोलीस ठाण्यांना नवे पोलीस निरीक्षक

 

 

वडगाव (मावळ) : मावळ तालुक्यातील पोलीस प्रशासनात नव्या बदलांची नांदी होत असून वडगाव मावळ आणि कामशेत या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नव्या नेतृत्वाची जोड मिळाली आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी शंकर पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून कामशेत पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी आकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांमुळे पोलीस यंत्रणेत अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

वडगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांची सांगली जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कामशेत पोलीस ठाण्यातून शंकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी, कामशेत येथे निर्माण झालेल्या रिक्त पदावर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून आकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्या व नियुक्त्या पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार पार पडल्या.

 

नवीन नियुक्त अधिकाऱ्यांचे संबंधित ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. स्थानिक पातळीवरही या नियुक्त्यांचे स्वागत होत असून, नागरिकांकडून अपेक्षांची उंची वाढलेली दिसून येत आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जाणारा भाग असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. लोणावळा, तुंग-तिकोणा लोहगड. परिसर, पवना धरण आदी पर्यटनस्थळांमुळे वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षेची जबाबदारी अधिकच वाढते. या पार्श्वभूमीवर नव्या अधिकाऱ्यांकडून नियोजनबद्ध आणि तत्पर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

शंकर पाटील आणि आकाश पवार यांनी गुन्हेगारीवर आळा घालणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांशी अधिक परिणामकारक संवाद साधणे यावर विशेष भर देण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत प्रशासनावर विश्वास निर्माण करणे, तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

 

संवेदनशील भागांमध्ये रात्रीच्या गस्तीत वाढ करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याचाही मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही नियोजन आहे.

 

दरम्यान, बदली झालेले निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस दलाबद्दल सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती, असे स्थानिकांनी सांगितले.

 

एकूणच, या नव्या नियुक्त्यांमुळे मावळ तालुक्यातील पोलीस प्रशासन अधिक सजग, गतिमान आणि उत्तरदायी होईल, तसेच नागरिकांना सुरक्षिततेची अधिक हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *